पुणे : ‘आबराकाडाबरा इव्हेंटस अॅन्ड एंटरटेन्मेंट’तर्फे आणि मकरंद देशपांडे यांची निर्मिती असलेले ‘ईमली पपिता टरबुज’ हे नाटक शनिवारी, चौदा एप्रिल रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी साडे बारा वाजता होणार आहे. अन्वय अश्तीवकर लिखित व तेजस मालप दिग्दर्शित या नाटकाचे कलादिग्दर्शन मकरंद देशपांडे यांनी केले असून, कथाही त्यांचीच आहे.
यामध्ये आकांक्षा गाडे, अन्वय अश्तीवकर, भारत मोरे, मयुरी मोहिते, अंकित म्हात्रे, आंचल पोतदार, प्रशांत अमलानी आणि अजिंक्य पारकर हे कलाकार आहेत. या नाटकाकरिता आशिष गाडे (संगीत), अमोघ फडके (प्रकाशयोजना), टेडी मौर्य (सेटस) यांनी काम केले आहे. नाटकाचा कालावधी एक तास वीस मिनिटांचा असून, ते हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहे. पाच वर्षांपुढील मुलांसाठी हे नाटक आहे.
‘ईमली पपिता टरबुज’ हे हिंदी नाटक लहान मुलांबरोबरच पालकांसाठीदेखील असून, ते भावंडांमधील बंध दर्शविणारे आहे. सनी आणि रिरी हे डिस्नीलँडला जाण्यासाठी उत्सुक असतात; पण कुटुंबातील काही निकडीच्या प्रसंगांमुळे त्यांची चुलत भावंडे कोकण मधून मुंबई येथे येतात. ती म्हणजे ईमली, पपिता आणि टरबुज. सनी आणि रिरी यांना त्यांचे येणे आवडत नाही. यातूनच अनेक विनोदी, भावनिक प्रसंग घडत जातात आणि त्यामधून त्यांच्यामध्ये आयुष्यभरासाठी ऋणानुबंध निर्माण होतात.